152 views
वडगाव मावळ दि.15 (प्रतिनिधी) येथील बाफना कुटुंबातील लाडका शिवम आता महक ऋषी म्हणून ओळखला जाईल. शुक्रवारी श्रमण संघीय युवाचार्य भगवंत महेंद्र ऋषीजी महाराज यांच्या निश्रायने आणि मालवा प्रवर्तक प्रकाश मुनिजी, उपप्रवर्तक अक्षय ऋषीजी, बरसादाता गौमत मुनिजी तसेच महाराष्ट्र प्रवर्तिनी प्रतिभा कंवरजी, राजस्थान प्रवर्तिनी सुप्रभाजी, उपप्रवर्तिनी प्रियदर्शना जी, तेलातप आराधिका चंदनबाला जी, उपप्रवर्तिनी सत्यसाधना जी, व्याख्यानी सम्यकदर्शना जी, प्रखरवक्ता अर्चना जी, तपस्वी रत्ना विचक्षणा जी, महासती चारुप्रज्ञा जी, उपप्रवर्तिनी सुमनप्रभा जी, उपप्रवर्तिनी सन्मती जी, उपप्रवर्तिनी दिव्यज्योती जी, विदुषी अक्षयश्री जी, साध्वी सुयशा जी, अनुष्ठान आराधिका कुमुदलता जी, साध्वी किर्तीसुधा जी, आयंबिल तप आराधिका सफलदर्शना जी, साध्वी सौरभ सुधा जी यांसह १०० हून अधिक जैन साधू-साध्वी वृंदांच्या सानिध्यात आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत ओगा स्वीकारून हा ऐतिहासिक दीक्षा समारंभ पार पडला.
यावेळी युवाचार्य महेंद्र ऋषीजी महाराज म्हणाले, "संयम ही मानवी जीवनाची सर्वोत्तम साधना आहे. संयम आत्म्याला शुद्ध करतोच, पण समाज आणि जगाच्या कल्याणाचाही मार्ग दाखवतो. संयमाचे जीवन कठीण असले तरी तेच खऱ्या आनंदाचा आणि आत्मिक शांततेचा मार्ग आहे. संयमाने आत्मा जन्म-मृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो आणि सद्गती प्राप्त करतो."
मालवा प्रवर्तक प्रकाश मुनिजी, उपप्रवर्तक अक्षय ऋषीजी, बरसादाता गौतम मुनिजी आणि उपस्थित साध्वी वृंदांनी संयम आणि धर्माचे महत्त्व साध्या आणि सोप्या भाषेत समजावले. त्यांनी सांगितले की, "संयम साधनेचा मार्ग असा आहे, ज्यामुळे व्यक्ती नरातून नारायण बनू शकतो."
वडगाव बनले तीर्थक्षेत्र:
या भव्य दीक्षा समारंभासाठी देशभरातून हजारो श्रावक-श्राविकांनी हजेरी लावली. वडगावचा संपूर्ण परिसर भक्तीमय झाला होता, जणू ते प्रती प्रयागराज तीर्थ बनले होते.
हितेन्द्रऋषिजी महाराजांनी सांगितले की, २० फेब्रुवारी रोजी लोणावळ्यात नवदीक्षित महक ऋषीजी महाराजांची मोठी दीक्षा होणार आहे.
श्री जैन स्थानकवासी जैन श्रावक संघ, युथ ग्रुप , महिला मंडळ , पाठशाळा ग्रुप , जैन सकल संघ वडगाव मावळ यांनी नियोजन केले.